
नवनीत बऱ्हाटे/उल्हासनगर
राजकारणात कोण कधी कोणाच्या गोटात जाईल, याचा नेम नसतो; पण जेव्हा निर्णयाच्याच दिवशी दिशा बदलते, तेव्हा नक्कीच राजकीय भूकंपाची चाहूल लागते. १० जून रोजी उल्हासनगरमध्ये असेच काहीसे घडले. ज्या दिवशी ओमी कलानी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा अंतिम मानल्या जात होत्या, त्याच दिवशी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत राजकीय समीकरणाला जबरदस्त वळण दिले. ही भेट केवळ औपचारिक सौजन्य भेट नव्हे, तर शिवसेना (शिंदे गट) आणि कलानी युतीच्या नव्या शक्यता तयार करणारी ठरू शकते.
एकीकडे उल्हासनगरमधील कलानी कुटुंब भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. ओमी पप्पू कलानी यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रवेशाची तारीख ठरल्याचेही बोलले जात होते. मात्र, त्या दिवशी म्हणजे १० जून रोजीच ओमी कलानी यांनी थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) चे प्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. ही भेट तातडीने घडवून आणल्याचे सूचक असून, भाजपच्या रणनीतीला या घडामोडीमुळे मोठा झटका बसला आहे.
ही भेट केवळ सौजन्यभेट होती की आगामी महापालिका निवडणुकांसाठी राजकीय रणनितीचा भाग, यावर सध्या कोणताही ठोस खुलासा झाला नसला, तरी या भेटीचे संकेत स्पष्ट आहेत. या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते कमलेश निकम हे देखील उपस्थित होते. ओमी कालानी आणि एकनाथ शिंदे भेटीबाबत प्रवक्ता कमलेश निकम यांना विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, कलानी परिवारात कोणीही बोलत नाही, तेव्हाच खूप काही घडत असते असा जुना अनुभव आहे.
कलानी - शिवसेना : जुनी युती, नवा अध्याय?
कलानी कुटुंब आणि शिवसेना यांच्यातील संबंध नवीन नाहीत. २०१९ मध्ये शिवसेनेचा महापौर उल्हासनगर महापालिकेत सत्तेवर आला, तेव्हा त्या यशामागे कलानी गटाची भूमिका ठळक होती. याच गटाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना बिनशर्त समर्थनही दिले होते. या पार्श्वभूमीवर पाहता, ओमी कलानी आणि एकनाथ शिंदे यांची भेट ही जुन्या नात्यांची जुळवाजुळव की नव्या गठबंधनाची सुरुवात, हे लवकरच स्पष्ट होईल.
कलानी कुटुंब निर्णायक ‘किंगमेकर’
राजकीय विश्लेषकांचे मत असे आहे की, कलानी-शिंदे युती केवळ सत्तेसाठी नव्हे, तर उल्हासनगरच्या राजकीय परिघात मोठा भूकंप घडवू शकते. एनसीपी (शरद व अजित गट), भाजप, शिवसेना आणि इतर स्थानिक गट यांच्या सत्तासंघर्षात कलानी कुटुंब निर्णायक किंगमेकर ठरू शकते. आता सगळ्यांच्या नजरा या गोष्टीवर खिळल्या आहेत - कलानींचा अंतिम राजकीय निर्णय काय असेल? आणि तो उल्हासनगरच्या सत्ता-समीकरणाला कसा बदलेल.