सोलापूरमध्ये (Solapur) माळशिरस तालुक्यातील अतुल बरोबर पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींशी लग्न झाले. (man married with twin sister now in trouble) या अनोख्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. यामुळे चर्चेत आलेल्या या लग्नावर आता काही जणांकडून टीका करण्यात येते आहे. एवढंच नव्हे तर रविवारी, नवरदेवावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला. तर आता या विवाहसोहळ्याची दखल महाराष्ट्र राज्य आयोगानेदेखील घेतली आहे. या आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ट्विट केले की, "सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले. या लग्नाची सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम ४९४ प्रमाणे हा गुन्हा आहे. तरी सोलापुर पोलिस अधिक्षक आपण उपरोक्त बाबत चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ चे कलम १२ (१) व १२ (२) अन्वये तात्काळ सादर करावा." असे आदेश सोलापूर ग्रामीण पोलिसांना देण्यात आले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पिंकी आणि रिंकी या दोघी जुळ्या बहिणींच्या वडिलांचे निधन झाले. काही महिन्यांपूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई या तीघीही आजारी पडल्या होत्या. यावेळी अतुल त्याच्या टॅक्सीतून त्यांना रुग्णालयात घेऊन गेला आणि त्यांची काळजी घेतली. त्याने दाखवलेल्या आपलेपणामुळे पिंकीला अतुल आवडायला लागला. यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोघी कधीही वेगळ्या राहिल्या नव्हत्या. म्हणून त्यांच्या आईच्या आणि अतुलच्या कुटुंबीयांच्या संमतीने दोघींनीही अतुलसोबतच विवाह करण्याचा निर्णय घेतला. पिंकी आणि रिंकी या दोघीही इंजिनियर आहेत. या दोघींचे शिक्षणदेखील एकत्रच झाले आहे. त्यानंतर एकाच आयटी कंपनीमध्ये दोघीही नोकरीला लागल्या. दोघीनांही एकमेकींची सवय लागली होती. त्यामुळे त्यांनी एकाच नवरदेवाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.