

पुणे : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या (मविआ) वतीने पुणे-नाशिक महामार्गावर, आंबेगाव (जिल्हा पुणे) येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारो शेतकरी आणि मविआचे प्रमुख नेते रस्त्यावर उतरल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
कांद्याला प्रति क्विंटल ३,००० रुपये (३० रुपये प्रति किलो) भाव मिळावा आणि ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कमी दरात कांदा विकला आहे, त्यांना प्रति किलो १५ ते २० रुपये नुकसान भरपाई किंवा अनुदान मिळावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. नाफेडद्वारे कांदा खरेदीची क्षमता २ लाख टनांवरून ८ ते १० लाख टनांपर्यंत वाढवण्यात यावी आणि कांदा खरेदीची प्रक्रिया बाजार समित्यांमार्फत व्हावी, जेणेकरून व्यापाऱ्यांऐवजी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य मिळेल या त्यांच्या अन्य मागण्या आहेत.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, खासदार नीलेश लंके आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.