
कराड : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे छोट्या छोट्या पुलांवर पाणी आले आहे. तसेच शेतांच्या सरीमध्ये व ओढेमध्ये पाणी साचल्याने पिकाचे देखील नुकसान होऊ लागले आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याला पावसाने चांगले झोडपून काढले असून पुसेगाव-फलटण मार्गावरील वेटण ओढ्यावर अजूनही पूल नसल्यामुळे काटेवाडी शिवारातील शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नेर तलावाच्या ओढ्यात पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा छातीइतक्या पाण्यातून बाहेर काढावा लागत आहे.
काटेवाडी शिवारातील शेतकरी आपला कांदा नुकसानीपासून वाचवण्यासाठी १४ मजुरांच्या मदतीने प्रति पिशवी ९० रुपये खर्च करून तब्बल ४०० फूट अंतरावरून कांदा बाहेर काढत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा कांदा वाचवण्यासाठी मजुरांनी देखील आपल्या जिवाची पर्वा केली नाही. मजुरांनी देखील कांद्याच्या पिशव्या जीव धोक्यात घालून पाण्यापलीकडे नेला.
काटेवाडी भागात पाण्याच्या अडथळ्यामुळे यंत्र किंवा बैलांच्या सहाय्याने शेती करणे अशक्य झाले असून, शेतकरी हातानेच पेरणी करत आहेत. त्यामुळे या वेटण ओढ्यावर किमान साकव पूल तरी लवकरात लवकर बांधावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
दरम्यान, यंदा मान्सूनने १५ दिवस आधीच प्रवेश केला असून, संपूर्ण देशभर तो चांगलाच सक्रिय झाला आहे. पुढील पाच दिवस मुंबई, ठाणे तसेच कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
वर्षानुवर्षे हा ओढा अडथळा ठरत असून देखील पूल न बांधल्याने शेतकऱ्यांना प्रत्येक पावसाळ्यात अशाच संकटांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या वेटण ओढ्यावर तातडीने साकव पूल बांधावा, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
साताऱ्यात ऑरेंज अलर्ट
सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सध्या सातारा, मुंबई आणि कोकण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून, पुढील चार ते पाच दिवस पुणे, मुंबई, सातारा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वेटण ओढ्यावर पूल नसल्याने शेतकरी त्रस्त
खटाव तालुक्यातील पुसेगाव-फलटण मार्गावरील वेटण ओढ्यावर पूल नसल्याने काटेवाडी शिवारातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नेर तलावाच्या पाण्याचा फुगवटा ओढ्यात साचल्याने साठवलेला कांदा बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांसह मजुरांनी मोठे परीश्रम केल्याचे दिसून आले. मात्र जीव धोक्यात घालूनही कांद्याला दर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वेटण ओढ्यावर किमान साकव पूल तरी बांधावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.