हारून शेख / लासलगाव
बांगलादेशमध्ये यंदा कांद्याचे बंपर उत्पादन झाल्याच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश सरकारने कांदा आयातीवर शुल्क लावले. त्यामुळे भारतीय कांदा उत्पादक व निर्यातदारांवर परिणाम झालेला असताना आता कर्नाटक राज्यात नवीन कांद्याची आवक सुरू होऊन आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ या दक्षिणेकडील राज्यांतही स्थानिक आवक वाढली. परिणामी, लासलगाव आणि नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्यामुळे कांद्याच्या दरात दररोज चढउतार होत आहेत. बाजारात कांद्याला १५०० रुपयेच्या आत प्रति क्विंटल सरासरी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने यंदा कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. कांदा उत्पादकांनी चांगल्या प्रतिचा साठवणूक केलेला कांदा नैसर्गिक आर्द्रतेमुळे खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यावर्षी रब्बी हंगामात देशभरात कांद्याचे उत्पादन खूप झाल्यामुळे बाजारपेठांमध्ये साठा वाढला आहे. त्याचा थेट परिणाम म्हणून सध्या बाजारात १५०० रुपयेच्या आत प्रति क्विंटल सरासरी दर मिळत आहे.
भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजार क्षेत्रात टिकून राहण्यासाठी RoDTEP सवलत १.९ टक्क्यांवरून किमान ५ टक्क्यांपर्यंत वाढवावी. तसेच निर्यात धोरण दीर्घकालीन असावे.
विकास सिंह, कांदा निर्यातदार, नाशिक
कांदा दरातील चढ-उतार आणि निर्यातीतील अनिश्चिततेमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. सध्या मिळणाऱ्या दरांतून उत्पादन खर्चही भरून निघत नाही,
सुनील गवळी शेतकरी, ब्राह्मण गाव, विंचूर
वारंवार निर्यात बंदी आणि निर्बंध लादल्यामुळे भारतीय निर्यातदारांचा सरकारवरील विश्वास ढासळत आहे, निर्यात धोरणात स्थिरता हवी.
निवृत्ती न्याहारकर, वाहेगाव साळ