धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोधकांचा विरोध ;अदानीच्या धारावी प्रकल्पावरही शरसंधान
नागपूर : धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या सदस्यांनी बुधवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर अदानी समूहाची बाजू घेत असल्याचा आरोप करत झोपडपट्टीतील रहिवाशांना वेठीस धरले जात असल्याचा दावा केला.
धारावी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मुंबई काँग्रेसच्या प्रमुख वर्षा गायकवाड, शिवसेनेचे (उबाठा) विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विरोधी पक्षांच्या इतर आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून या मुद्द्यावरून घोषणाबाजी केली.
धारावी वाचवा, लघुउद्योग वाचवा' अशी व त्या प्रकारच्या घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाच्या संकुलात निषेध केला.
देशाच्या आर्थिक राजधानीच्या मध्यवर्ती भागात असलेले धारावी हे औषध, चामडे, पादत्राणे, कपडे यासह इतर गोष्टींचे उत्पादन करणाऱ्या अनेक लघु, असंघटित उद्योगांचे केंद्र आहे. हे आशियातील सर्वात मोठे झोपडपट्ट्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते.
या संबंधात दानवे म्हणाले की, "सरकार धारावीची जमीन अदानीला भेट देत आहे. पण झोपडपट्टीत लघुउद्योग चालवणाऱ्या अनेकांना या प्रक्रियेचा फटका बसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अदानीच्या धारावी प्रकल्पाच्या सर्व करारांवर आणि निविदांवर सह्या केल्या. धारावीतील ७० हजाराहून अधिक लोकांना तेथे घरे मिळतील की नाही, याबाबत शंका आहे. त्याचप्रमाणे टीडीआरची मालकीही अदानी समूहाला त्यांना दिली जात आहे. यामुळे सरकार अदानींसाठी काम करते की, लोकांसाठी, असाही सवाल यावेळी दानवे यांनी केला.