कोकणात ऑरेंज अलर्ट, वादळी वाऱ्यांचा इशारा; घाटमाथा, विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात पुन्हा एकदा मान्सूनने जोरदार पुनरागमन केले असून अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई-ठाणे, पालघरसह कोकण, घाटमाथा, नाशिक, विविध जिल्ह्यांत संततधार सुरू असताना भारतीय हवामान विभागाने पुढील १२ तासांसाठी महाराष्ट्रासह देशातील १८ राज्यांना वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
कोकणात ऑरेंज अलर्ट, वादळी वाऱ्यांचा इशारा; घाटमाथा, विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज
कोकणात ऑरेंज अलर्ट, वादळी वाऱ्यांचा इशारा; घाटमाथा, विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पुणे : राज्यात पुन्हा एकदा मान्सूनने जोरदार पुनरागमन केले असून अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई-ठाणे, पालघरसह कोकण, घाटमाथा, नाशिक, विविध जिल्ह्यांत संततधार सुरू असताना भारतीय हवामान विभागाने पुढील १२ तासांसाठी महाराष्ट्रासह देशातील १८ राज्यांना वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांत ताशी ८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यातील नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि घाटमाथा परिसरात अतिजोरदार पावसाचा अंदाज असून कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

खरीप पिकांना जीवदान

या पावसामुळे शेतीला मोठा दिलासा मिळाला असून खरीप पिकांना जीवनदान मिळाल्याचे चित्र आहे. सततच्या पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून अनेक धरणांमध्येही पाणीसाठा वेगाने वाढत आहे.

जायकवाडी ५३%भरले; सेकंदाला १३ लाख लिटर पाणी आवक

नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे सध्या जायकवाडीत ४७,४०५ क्युसेक (सुमारे १३ लाख ४२ हजार ३५७ लिटर प्रति सेकंद) वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. अवघ्या ४ दिवसांत तब्बल ४८१.३८ दलघमीहून अधिक पाण्याची आवक झाली आहे. २२ जुलै रोजी ३१ टक्के असलेला उपयुक्त जलसाठा रविवारी रात्री ९ वाजेपर्यंत ५३.४१ टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा ७९.२५ टक्क्यांवर होता. एल निनोचे सावट आणि मान्सूनच्या उशिराच्या आगमनानंतरही धरण निम्म्याहून अधिक भरल्याने मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्यासह सिंचन आणि उद्योगांचाही पाणीप्रश्न निकाली निघाला आहे.

उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीसाठी इशारा   

हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाल्यांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in