
मुंबई : मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेकदा विविध गंभीर विषयांवर मंत्र्यांमध्ये खासगी चर्चा होते. मात्र बैठकीत होणारी खासगी चर्चा आऊट होऊन प्रसिद्ध होते. मंत्री मंडळात होणारी खासगी चर्चा यापुढे बाहेर पडू नये यासाठी मंत्र्यांच्या ओएसडी, विशेष कार्य अधिकाऱ्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र शिवसेनेच्या एका मंत्र्यांचे ओएसडी बैठकीत बसून राहिल्याने अखेर सुरक्षारक्षकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यमंत्री मंडळाची बैठक सकाळी १०.३० वाजता सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. फडणवीस यांनी खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्यास मनाई केली. मात्र, शिवसेनेच्या एका मंत्र्याचे ओएसडी बैठकीला थांबून राहिले.
सुरक्षारक्षकांनी ही बाब संबंधित मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्या मंत्र्यांनी संबंधित ओएसडीला बाहेर जाण्याची सूचना केली. सुरक्षारक्षकांनी त्यांना बाहेर काढले. सर्व मंत्री आणि सचिव हा प्रकार आश्चर्याने पाहत होते.
मुख्यमंत्र्यांचा कठोर पवित्रा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून मंत्री, प्रशासकीय कामकाज यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अनेक वेळा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडते आणि बैठकीतील खासगी चर्चा जगजाहीर होते, असा अनुभव मुख्यमंत्र्यांना अनेकदा आला आहे. त्यामुळे फडणवीस यांनी प्रशासकीय अधिकारी व मंत्र्यांचे कान टोचले.