मुंबई : राज्यात पाच लाखांहून अधिक नोकरदार महिला आहेत. त्यांना आपल्या मुलांची योग्य काळजी घेता यावी यासाठी केंद्र सरकारच्या मिशन शक्ती अंतर्गत राज्यात ३४५ ठिकाणी ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी 'पाळणा' ही योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुलांच्या संगोपनासाठी सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पाळणाघरांमध्ये डे-केअर सुविधा, पूर्व शालेय शिक्षण, पूरक पोषण आहार, वाढीचे निरीक्षण, आरोग्य तपासणी, लसीकरण आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच मुलांना दिवसातून तीन वेळा म्हणजेच सकाळचा नाश्ता, दुपारचे गरम शिजवलेले जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता देण्यात येईल.
पाळणाघर महिन्यातील २६ दिवस, दररोज ७.५ तास सुरू राहील, यामध्ये जास्तीत जास्त २५ मुले असतील. वीज, पिण्याचे पाणी, बालस्नेही शौचालय यांसारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविका यांना प्रतिमाह १५०० रुपये भत्ता देण्यात येणार आहे.
अशी असणार कार्यपद्धती
महिन्यातील २६ दिवस व रोज ७.५ तास पाळणा सुरू राहील
एका पाळण्यात जास्तीत जास्त २५ मुलांची व्यवस्था असेल
प्रशिक्षित सेविका (किमान बारावी उत्तीर्ण) व मदतनीस (किमान दहावी उत्तीर्ण) यांची नेमणूक करणार
वयोमर्यादा २० ते ४५ वर्षे, भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य असेल
अशी आहे पाळणा योजना!
नोकरदार मातांच्या ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित देखभाल व डे-केअर सुविधा
३ वर्षांखालील मुलांसाठी पूर्व उद्दीपन, तर ३ ते ६ वर्षांच्या मुलांसाठी पूर्व शालेय शिक्षण
मुलांसाठी सकस आहार पुरविणार
पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी, लसीकरण, वाढीचे नियमित निरीक्षण
वीज, पाणी, बालस्नेही शौचालय आदी सर्व मूलभूत सोयीसुविधांसह मुलांसाठी सुरक्षित वातावरण