

सूर्यकांत आसबे/सोलापूर
राज्याच्या विविध भागात चांगला बरसलेला पाऊस आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला संवर्धन कामामुळे प्राप्त झालेले पुरातन स्वरूप पाहण्याची उत्सुकता असल्याने यंदाची आषाढी यात्रा विक्रमी ठरली आहे. विशेष म्हणजे दशमीपर्यंतच १५ लाख भाविक येथे दाखल झाले असावेत, असा अंदाज आहे. एकादशीपर्यंत हा आकडा आणखी वाढणार आहे.
दशमीच्या दिवशीच पंढरपूर शहरात भाविकांची मोठी गर्दी झाली असून मिळेल त्या ठिकाणी ते तंबू, राहुट्या उभारून रहात आहेत. भक्तिसागरच्या ६५ एकरासह शहराच्या विविध रस्त्यांवर उभारण्यात आलेली मुक्कामाची ठिकाणे भरली आहेत. यंदाची यात्रा ३५ लाखांपर्यंत विक्रमी भरणार याचा अंदाज प्रशासनास आल्याने वारीची तयारी अगोदरपासूनच केली जात आहे.
प्रशासनाने केली जय्यत तयारी
भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर समितीच्यावतीने दर्शनरांगेत जादाची पत्राशेड उभारण्यात आली असली तरी ती अपुरी पडत असून रांग गोपाळपूरच्या पुढे स्वेरी कॉलेजपर्यंत गेली होती. हजारो भाविक दर्शन रांगेत उभेत आहेत. यात्रेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पोलीस कर्मचारी, होमगार्ड, विविध पथके येथे तैनात आहेत. गर्दीच्या ठिकाणी जास्त बंदोबस्त असून सीसीटीव्ही यंत्रणाही सज्ज आहे.
उलाढालही मोठी होणार असल्याने व्यापारी आनंदले
दरम्यान आषाढी विक्रमी भरली असल्याने यंदा उलाढालही चांगली होणार हे निश्चित असल्याने व्यापारी वर्गानेही तशी तयारी केली आहे. प्रसादासह विविध वस्तूंची दुकाने सजली आहेत.त्याचबरोबर शहरातील विविध मठ भाविकांनी भरले असून उपनगरातील मैदानांमध्येही यात्रेकरू उतरले आहेत.
पहाटे शासकीय महापूजा, कार्यक्रमांचे आयोजन
आषाढी एकादशीची शासकीय महापूजा शनिवारी एकादशी दिवशी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी झाली असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी दुपारीच पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. पहाटे मानाच्या वारकरी दांपत्यासह त्यांनी महापूजा केली.
दोन दिवस येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एकादशीच्या महासोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी आषाढी दशमी दिवशी चंद्रभागा नदीच्या पात्रात स्नानासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी वाळवंटाला भक्तिचा महापूर आल्याचे चित्र होते.