
महाविकास आघाडी सरकारने परमबीर सिंह यांचे केलेले निलंबन शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतले आहे. यावर महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. आज (17 मे) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीपुर्वी देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, "मला फसवण्यासाठी परमबीर सिंह यांचा वापर करण्यात आला होता. आता बक्षिस म्हणून शिंदे-फडणवीस सरकारकडून त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. या प्रकरणी मी कोअर समितीच्या बैठकीत सविस्तर बोलणार असून त्यांतरच माध्यमांशी संवाद साधेल", असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते तसेच प्रदेश सरचिटणीस प्रवीण कुंटे पाटील यांनी अनिल देशमुख यांना फसवण्याचा प्रयत्न कोणत्या अदृष्य शक्तींनी केला हे स्पष्ट झाले असल्याचा आरोप केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, "परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर आरोप केल्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले. मात्र, सिंह यांच्यावरच भ्रष्टाचार, खंडणीचे 10 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी ते काही दिवस फरार देखील होते. तरी देखील शिंदे सरकार सिंह यांना संरक्षण देत आहे. अंबानींच्या घरासमोर जिलेटिन ठेवले, तसेच मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्माचा जामीन अर्ज फेटाळताना मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात परमबीर सिंह यांचा मुख्य सहभाग असल्याचे निरीक्षण नोंदवले असून देखील शिंदे सरकार त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून त्यांना संरक्षण देत आहे." असे कुंटे यांनी म्हटले आहे.
प्रवीण कुंटे पुढे बोलताना म्हणाले की, "भाजप व त्यांच्या सरकारवर बोलणाऱ्यांचा आवाज दडपण्याचे काम सध्या सुरु आहे. केंद्राकडून या लोकांना ईडी, सीबीआय सारख्या तपासयंत्रणांच्या नोटीस पाठवल्या जातात. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राज्यभर दौरे करुन भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणत असल्याने त्यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे." असा आरोप देखील कुंटे यांनी केला आहे.