पाथरपुंज पावसाचे ‘नवे माहेरघर’; चेरापुंजीला मागे टाकत बनले सर्वाधिक पावसाचे ठिकाण

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाथरपुंज गावाने यावर्षीच्या मान्सूनमध्ये मेघालयातील चेरापुंजीला मागे टाकत देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण मिळवले आहे.
पाथरपुंज पावसाचे ‘नवे माहेरघर’; चेरापुंजीला मागे टाकत बनले सर्वाधिक पावसाचे ठिकाण
Published on

रामभाऊ जगताप/कराड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाथरपुंज गावाने यावर्षीच्या मान्सूनमध्ये मेघालयातील चेरापुंजीला मागे टाकत देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण मिळवले आहे. पाथरपुंजने राज्यातील पारंपरिक पावसाळी ठिकाणे जसे की कोयना, नवजा, महाबळेश्वर, वलवण यांनाही मागे टाकत पावसाचे ‘नवे माहेरघर’ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

पाथरपुंजमध्ये १ जून ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ६८१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच काळात मेघालयातील चेरापुंजीमध्ये फक्त ६२७९.५० मिमी पावसाची नोंद झाली. मान्सून कालावधी (१ जून ते ३१ ऑगस्ट) लक्षात घेतल्यास पाथरपुंजमध्ये ६८१३ मिमी तर चेरापुंजीमध्ये ३९७५.१० मिमी पाऊस नोंदवला गेला, ज्यातून दोन्ही ठिकाणांमधील अंतर स्पष्ट होते. पाथरपुंज हे गाव सातारा, सांगली आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहे. गावाच्या दक्षिण व पश्चिम बाजूला सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या हद्दी लागतात. येथील काही घरे तीनही जिल्ह्यांच्या सीमांना लागून आहेत. कोयनेच्या दक्षिण टोकाजवळ असूनही, पावसाचे पाणी थेट वारणा धरणात जमा होते. त्यामुळे धरण भरण्यात या गावाचा महत्वाचा वाटा आहे.

राज्यातील इतर पावसाळी ठिकाणांची आकडेवारी

पाथरपुंज: ६८१३ मिमी

दाजीपूर: ५९९२ मिमी

वलवण: ५९११ मिमी

जोर: ५६१२ मिमी

नवजा: ५३६० मिमी

गगनबावडा: ५२४२ मिमी

महाबळेश्वर: ५१३६ मिमी

कोयना: ४३२१ मिमी

मान्सून २०२५ (१ जून ते ३१ ऑगस्ट)

ठिकाण पर्जन्यमान (मिमी)

पाथरपुंज ६८१३

चेरापुंजी ३९७५.१०

चेरापुंजीचे रेकॉर्ड धोक्यात?

चेरापुंजीच्या नावावर दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत. एकेकाळी (ऑगस्ट १८६० ते जुलै १८६१) येथे २६,४७१ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र अलीकडच्या वर्षांत पाथरपुंजमध्ये सातत्याने पडणाऱ्या विक्रमी पावसामुळे हवामान बदलाच्या काळात पर्जन्यमानाचे केंद्र पश्चिमेकडे सरकत असल्याचे दिसत आहे. सन २०१९ पासून पाथरपुंज सातत्याने चेरापुंजीला मागे टाकत आहे. हा कल कायम राहिला, तर लवकरच पाथरपुंजचे नाव देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून कोरले जाऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in