

भंडारा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या एका महिला शेतकऱ्याची मोठी निराशा झाली. त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यात अपेक्षित २,००० रुपयांऐवजी केवळ '१ पैसा' जमा झाल्याचा संदेश आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. दरम्यान, कृषी विभागाने मंगळवारी यावर स्पष्टीकरण देताना हा केवळ तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले असून शेतकऱ्याच्या खात्यात पूर्ण हप्ता जमा झाल्याचे स्पष्ट केले आहे.
जेवनाळा गावातील ६५ वर्षीय लाभार्थी शेतकरी लक्ष्मीबाई यांचे पुत्र खेमराज यांनी ही माहिती दिली. आईच्या मोबाईलवर योजनेचा हप्ता म्हणून ‘०.०१ रुपया’ खात्यात जमा झाल्याचा संदेश आला तेव्हा कुटुंब थक्क झाले. खरीपाची पेरणी तोंडावर असल्याने बियाणे व खते खरेदीसाठी पैशांची गरज असतानाच हा प्रकार घडल्याचे ते म्हणाले.
लगेच चूक सुधारली
भंडारा जिल्हा कृषी अधिकारी संगीता माने यांनी तांत्रिक चुकीमुळे असा संदेश गेला असण्याची शक्यता वर्तवली तसेच अधिकृत नोंदीनुसार संबंधित महिला शेतकऱ्याच्या बँक खात्यात नेहमीप्रमाणे दोन रुपयांचा हप्ता यशस्वीपणे जमा झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.