

पुणे : ‘एसआयआर’ या प्रक्रियेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुमारे २ कोटी ९० लाख मतदारांची नावे बेकायदेशीरपणे वगळली जाणार असून, हा लोकशाहीतील सर्वात मोठा ‘वोट चोरी’चा प्रकार असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका करत त्यांनी याला “संस्थात्मक भ्रष्टाचार” असे संबोधले आणि या कथित ‘फ्रॉड’विरोधात नागरिकांनी जागरूक होण्याचे आवाहन केले.
आंबेडकर म्हणाले की, लोकप्रतिनिधी कायदा १९५० च्या कलम २१ नुसार कोणत्याही मतदाराचे नाव यादीतून वगळण्यापूर्वी संबंधिताला वैयक्तिक नोटीस देणे बंधनकारक आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून सुमारे ३० ते ४० हजार मते कमी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातून अडीच लाख मते कमी करण्याचे नियोजन असल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका तांत्रिक कारणांवर फेटाळण्यात आल्याबद्दलही आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली.
७५ लाख मतांवर संशय
या कथित गैरप्रकाराचे स्वरूप स्पष्ट करताना आंबेडकर यांनी अर्थतज्ज्ञ डॉ. प्रभाकरण यांच्या विश्लेषणाचा हवाला दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, आंध्र प्रदेशमध्ये मतदानाची वेळ संपल्यानंतर रात्री ११ ते २ दरम्यान ४.९५ टक्के अतिरिक्त मतदान झाले होते. महाराष्ट्रातही अशाच पद्धतीचा वापर झाला असून मतदान संपल्यानंतर तब्बल ७५ लाख अतिरिक्त मते नोंदवली गेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.