
मुंबई : लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत. थांब्याचे सर्वेक्षण करून अहवाल १५ दिवसात सादर करण्याच्या सूचनादेखील महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना केल्या आहेत.
तक्रारीची दखल घेऊन सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला धोरण स्वीकारण्याची निर्देश दिले आहेत. राजकीय दबावाला बळी न पडता प्रवाशांच्या आरोग्याची कोणती तडजोड न करता संबंधित हॉटेल-मोटेल थांब्यावर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत. सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्याचे नव्याने सर्वेक्षण करून तेथील प्रवासी सुविधांची चाचपणी करावी. जे थांबे प्रवाशांना योग्य सुविधा देत नसतील त्यांच्यावर कारवाई करावी व नव्या थांब्यांना मंजुरी द्यावी. तसेच याबाबतचा सविस्तर अहवाल १५ दिवसात आपल्याला सादर करावा असे निर्देशित त्यांनी दिले आहेत.
प्रवाशांच्या तक्रारी
लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा -नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु अनेक हॉटेलमधील थांब्यांबाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, फराळाचे जिन्नस शिळे, अशुद्ध व महाग असणे, याचबरोबर संबंधित हॉटेलमधील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एस टी प्रवासांच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा प्रकारच्या तक्रारी उद्भवत आहेत.