

मुंबई : जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून राज्य सरकारने ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर केले. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानंतर शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी तलाठी, कृषी अधिकारी आदींनी पंचनाम्यास सुरुवात केली. पंचनामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आठ महिन्यांची गरोदर असताना तलाठी चैताली चिवटे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. चैताली चिवटे यांच्या कामाचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी कौतुक केले आहे.
पूर आणि अतिवृष्टीमुळे येथील अनेक शेतकऱ्यांची घरे वाहून गेली, शेतीचे मोठे नुकसान झाले आणि दुर्दैवाने जनावरेही वाहून गेली. हे मोठे दुःख असताना, निमगावमध्ये कार्यरत असलेल्या तलाठी चैताली चिवटे यांनी स्वतःच्या प्रकृतीची चिंता न करता नुकसानग्रस्त गावांमध्ये थेट पाहणी केली. निमगाव हे गाव पूर्णतः नदीकाठी असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. नदीकाठी असलेली ६५ घरे पूर्णपणे पाण्याखाली होती. अशा भीषण परिस्थितीतही चैताली चिवटे यांनी ग्रामसेवक आणि पोलीस पाटलांच्या सोबतीने पुरामुळे पडझड झालेल्या घरांचे, शेतीच्या पिकांचे नुकसान आणि खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे केले.