लोकसभा निवडणुकीची तयारी : राज्यात नवमतदारांची संख्या 'इतकी' वाढली, एकूण ९ कोटींहून जास्त मतदार पात्र

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २७ लाखांनी जास्त असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीची तयारी : राज्यात नवमतदारांची संख्या 'इतकी' वाढली, एकूण ९ कोटींहून जास्त मतदार पात्र

प्रतिनिधी/मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक पारदर्शी आणि निर्भयी वातावरणात पार पाडण्यासाठी राज्याची निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी येथे दिली. भारत निवडणूक आयोगाचे उपमुख्य आयुक्तांनी अलीकडेच मुंबईत बैठक घेऊन सर्वसंबंधित विभागांना लोकसभा निवडणुकीत बेहिशोबी पैसे, अमली पदार्थ आदींचा वापर होणार नाही, याबाबत सूचना दिल्या आहेत. पुढील महिन्यात मुख्य निवडणूक आयुक्त मुंबईत येऊन निवडणूक तयारीचा आणखी आढावा घेतील, असेही देशपांडे यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्यात घेण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ९ कोटींपेक्षा जास्त मतदार आपला हक्क बजावणार आहेत. ही संख्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २७ लाखांनी जास्त असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी मतदार याद्या अद्ययावतीकरण आणि त्याचे शुद्धीकरण हे महत्त्वाचे काम सुरू असते. राज्यात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून २७ ऑक्टोबर २०२३ ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत हे काम सुरू होते. त्यानंतर या कार्यालयाकडे आलेल्या माहितीनुसार, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ कोटी १२ लाख ४४ हजार ६७९ इतके नागरिक मतदानासाठी पात्र ठरले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हा आकडा ८ कोटी ८५ लाख ६४ हजार ५३५ इतका होता, असे त्यांनी सांगितले. यावेळी राज्यात २६ लाख ८० हजार १४४ मतदारांची भर पडली आहे.

logo
marathi.freepressjournal.in