२०११ पूर्वीच्या झोपड्यांना संरक्षण, विधानसभेत घोषणा; सरकारी, वन आणि सिडकोच्या जमिनींवरील रहिवाशांना दिलासा

राज्यातील सरकारी, वन तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर १ जानेवारी २०११ पूर्वी उभारण्यात आलेल्या सर्व झोपड्यांना सरकार पूर्ण संरक्षण देणार असून, त्यांचे एसआरए, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन केले जाईल, अशी    घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
२०११ पूर्वीच्या झोपड्यांना संरक्षण, विधानसभेत घोषणा; सरकारी, वन आणि सिडकोच्या जमिनींवरील रहिवाशांना दिलासा
२०११ पूर्वीच्या झोपड्यांना संरक्षण, विधानसभेत घोषणा; सरकारी, वन आणि सिडकोच्या जमिनींवरील रहिवाशांना दिलासा'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : राज्यातील सरकारी, वन तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर १ जानेवारी २०११ पूर्वी उभारण्यात आलेल्या सर्व झोपड्यांना सरकार पूर्ण संरक्षण देणार असून, त्यांचे एसआरए, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन केले जाईल, अशी    घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचे येत्या तीन महिन्यांत विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भातील धोरणाला मंजुरी मिळाल्यानंतर बावनकुळे यांनी एका निवेदनाद्वारे याबाबतची माहिती दिली. या निर्णयानुसार आता राज्यभरात युद्धपातळीवर कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

उच्चस्तरीय समिती

मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि कोकण विभागातील कांदळवन (मॅन्ग्रोव्हज), वन जमीन, महसूल, नझुल तसेच सिडकोच्या जमिनींवर मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण झाले आहे. विकास आराखडा, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र किंवा वन विभागाचे कडक नियम असल्यामुळे अनेक ठिकाणी या जमिनींवरील घरे त्याच जागी नियमित करणे शक्य नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून आणि मुंबई आणि    मुंबई उपनगराच्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक विशेष समिती गठीत करण्यात आली असून, त्यांच्याद्वारे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

तीन महिन्यांत पुनर्वसनाचा आराखडा

पुढील तीन महिन्यांत सर्व संबंधित जमिनींवरील रहिवाशांचे बायोमॅट्रिक आणि प्रत्यक्ष सर्वेक्षण पूर्ण केले जाईल. ज्या जागांवर पर्यावरण किंवा तांत्रिक कारणांमुळे घरे नियमित करता येणार नाहीत, तिथल्या रहिवाशांना म्हाडा, सिडको किंवा एसआरएच्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये कुठे आणि कसे सामावून घेता येईल, याचा संपूर्ण आराखडा (मास्टर प्लॅन) यादरम्यान तयार केला जाईल. १ जानेवारी २०११ पूर्वीच्या एकाही अधिकृत पात्र रहिवाशाला बेघर होऊ दिले जाणार नाही आणि सरकार त्यांच्या हक्काच्या घरासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे, अशी ग्वाही महसूल मंत्र्यांनी यावेळी दिली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in