राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावेळी आमदार बच्चू कडू यांनी त्यांना समर्थन दिलं होते. त्यावर गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप अपक्ष आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू अत्यंत दुखावले गेल्याचं पाहायला मिळत आहेत. तसेच, त्यांनी रवी राणांना १ नोव्हेंबरपर्यंत आरोप सिद्ध करण्याचे आव्हान देखील दिलं आहे.
बच्चू कडू यांनी बुधवारी ( २६ ऑक्टोंबर ) नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बच्चू कडू म्हणाले, “रवी राणा यांची एकट्याची बोलण्याची हिंमत नाही, ते कोणाच्या भरवशावर बोलतात हे तपासलं पाहिजे. राणांनी केलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी आमदारांना गुवाहाटीला नेत पैसे दिले, असा प्रश्न उभा राहतो.”