शहर स्वच्छतेसाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त शहरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे.
शहर स्वच्छतेसाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड : माझे शहर सुंदर शहर या संकल्पनेला कृतीत उतरविण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घर व परिसरापासून स्वच्छतेला सुरवात करावी. प्रत्येकाने फक्त पंधरवडयापुरतेच नव्हे तर स्वच्छतेची कायमस्वरुपी सवय लावून घेतली पाहिजे. स्वच्छतेची ही चळवळ जनमाणसात लोकचळवळ निर्माण झाली तरच खऱ्या अर्थाने आपण कचरामुक्त शहर करण्याकडे वाटचाल करण्यात यशस्वी होवू, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी माजी खासदार तथा नागरी कृती समितीचे सल्लागार डॉ. व्यंकटेश काब्दे, स्वारातीम विद्यापीठाचे संचालक डॉ. मल्लिकार्जून करजगी, नागरी कृती समितीचे डॉ. लक्ष्मण शिंदे, डॉ. बालाजी कोम्पलवार, डॉ. अशोक सिध्देवाड, मनपाचे उपायुक्त निलेश सुंकेवार, जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, कापड मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष, सर्व एनजीओचे अध्यक्ष, किराणा, हॉटेल, लायन्स क्लब, अडत व्यापारी, बार परमिट असोसिएशनचे अध्यक्ष यांची उपस्थिती होती.

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त शहरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्वच्छता मोहिम शहरात यशस्वीपणे राबविण्याचे नियोजन सर्वाच्या सहभागातून करावे. त्यादृष्टीने उपाययोजना आखण्यात येतील. या मोहिमेचा १७ सप्टेंबर रोजी करण्याचे नियोजन असून, या स्वच्छता पंधवाडयात स्थानिक नागरिक, मनपा, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी यांच्या सहभागातून स्वच्छतेसाठी विविध प्रभागनिहाय दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in