

पुणे : अंगणवाडीत पुरवले जाणारे वाटाणे शिजत नाहीत अशी तक्रार करणाऱ्या एका अंगणवाडी सेविकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर अंगणवाडी सेविकेला सेवानियमांचा भंग केल्यावरून निलंबित करण्यात आले होते. पण त्यावर विरोधी पक्षांसह सर्वांनी जोरदार टीका केल्याने संध्याकाळी हे निलंबन मागे घेण्यात आले.
अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांनी माध्यान्ह भोजनासाठीचे कडधान्य वाईट दर्जाचे असल्याचा एक व्हिडीओ केला. याशिवाय इतर भरड धान्येही शिजवण्यासाठी अत्यंत कठीण असून चार महिन्यांचा हा साठा असाच कसा साठवून ठेवायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शासनाने आमच्या लहान मुलांच्या आयुष्याशी खेळू नये, असे भावूक आवाहन करत त्यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणी तत्काळ हस्तक्षेप करून अन्नपुरवठ्याची पाहणी करावी, अशी मागणी केली.
आंबेगावचे आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी राज्यभरात अन्नाच्या गुणवत्तेबाबत अशा तक्रारी असल्याचे मान्य केले आहे.
काय आहे प्रकरण?
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. पिवळे वाटाणे कुकरच्या अनेक शिट्ट्या झाल्यानंतरही शिजत नसल्याचे दाखवले. हे अन्न खाल्ल्यानंतर अनेक मुलांना पोटदुखीचा त्रास झाला आणि मुलांनी ते खाण्यास नकार दिला, असा आरोप पारधी यांनी केला.