पुणे : वातावरण बदलामुळे तापमानात होणाऱ्या बदलांबाबत ‘इन्फोसिस’ या जगविख्यात कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. तापमान व हवामान बदलाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे पुणे, बंगळुरू व हैदराबाद ही मोठे शहरे कडेलोटाच्या उंबरठ्यावर आहेत. या शहरांत होणारे स्थलांतर भयानक आहे. या शहरांमध्ये ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर रोखणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना मूर्ती म्हणाले की, देशातील कॉर्पोरेट क्षेत्राला या समस्येची सोडवणूक करण्यासाठी नेते व प्रमुख विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत एकत्रित येऊन काम करावे लागेल. त्यामुळे मोठ्या शहरांमधील स्थलांतर रोखले जाऊ शकेल. कारण स्थलांतर हे आता मोठे आव्हान बनले आहे. सर्वांनी एकत्रित येऊन ही समस्या सोडवावी लागेल, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद शहरांमध्ये जीवन जगणे आता कठीण बनत चालले आहे. कारण प्रदूषण व वाहतुक कोंडीची समस्या उग्र बनली आहे.
तरुण पिढीने समाज आणि पर्यावरणाप्रती जबाबदारीची भावना आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, “आपण समाजातील वंचित घटकांची काळजी घेतली पाहिजे, अन्यथा आपण आणि प्राण्यांमध्ये कोणताही फरक राहणार नाही.