

पुणे : बुधवार पेठ परिसरातील काळोख्या गल्ल्यांमध्ये गेल्या दोन दशकांपासून पोलिसांच्या नजरेतून सुटत मानवी तस्करीचे जाळे विणणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. फरासखाना पोलीस ठाणे आणि खडक पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने राबवलेल्या धडक कारवाईत तब्बल ११ बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार बाबू भैय्या ऊर्फ पापा शेख असल्याचे तपासात समोर आले असून तो सध्या फरार आहे.
हॉटेलमध्ये साधा कामगार म्हणून कामाला सुरुवात केलेल्या पापा शेखने गेल्या २० वर्षांत पुण्यात मानवी तस्करीचे मोठे जाळे उभे केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हे दाखल केले असून सुमित्रा कांबळे, राजेश कलीमनी, रणजीत पात्रा आणि रूपा शेख यांना अटक करण्यात आली आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण २२ महिलांना ताब्यात घेतले होते. सखोल चौकशीत त्यापैकी ११ महिला या मूळच्या बांगलादेश येथील नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. पापा शेखच्या तीन पत्नी या परिसरात महिलांवर देखरेख ठेवण्याचे काम करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. या चक्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना मारहाण करून दहशतीखाली ठेवले जात होते. त्यांच्या कमाईतील मोठा हिस्सा पापा शेख आणि त्याच्या टोळीमार्फत घेतला जात असल्याचेही उघड झाले आहे.