

कराड : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील महत्त्वाच्या पुणे-मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण पूर्ण झाल्याने रेल्वे वाहतुकीला मोठी गती मिळाली आहे. अप-डाऊन दोन्ही मार्ग उपलब्ध झाल्याने गाड्यांचा वेग वाढला असून वेळेची बचत होत आहे. मात्र, प्रवाशांची वाढती गर्दी आणि मर्यादित गाड्यांची संख्या लक्षात घेता, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकाला देशाच्या कानाकोपऱ्यात जोडण्यासाठी गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.
तथापि, गाड्यांची संख्या अद्याप अपुरी असल्याने प्रवाशांना रिझर्वेशनसाठी दोन-दोन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. कोल्हापूर, मिरज, सांगली, कराड, सातारा तसेच उत्तर
कर्नाटकातील हुबळी व बेळगाव येथून देशभरासाठी अधिक गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. तसेच या प्रमुख स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याचीही मागणी आहे.
रेल्वे मार्गाचा उपयोग केवळ प्रवासी नव्हे, तर शेती व औद्योगिक मालवाहतुकीसाठीही महत्त्वाचा असल्याने व्यापारी व उद्योजकांकडून मालगाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे. यामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्यांचा मार्ग सुकर
पुणे विभागातील एकूण ९२५ किमी लोहमार्गापैकी सुमारे ५८८ किमी दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. पुणे-मिरज, पुणे-दौंड, पुणे-लोणावळा आणि दौंड-मनमाड हे प्रमुख मार्ग दुहेरी झाल्याने प्रवासी व मालगाड्यांची वाहतूक अधिक सुरळीत झाली आहे. पूर्वी एकेरी मार्गामुळे गाड्यांना क्रॉसिंगसाठी थांबावे लागत होते, मात्र आता ती अडचण दूर झाली आहे. विद्युतीकरणामुळे डिझेलऐवजी इलेक्ट्रिक इंजिनचा वापर वाढला असून गाड्यांचा वेग आणि वेळेची अचूकता सुधारली आहे. विशेषतः दक्षिण भारत-उत्तर भारत दरम्यान धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी हा मार्ग अधिक सुकर ठरला आहे.
मिरज-कोल्हापूर मार्गाचा प्रश्न प्रलंबित
मिरज-कोल्हापूर (२७.३५ किमी), लोणंद-फलटण, दौंड-बारामती, अहमदनगर-आष्टी आदी मार्गांचा समावेश आहे. विशेषतः मिरज-कोल्हापूर मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण अद्याप प्रलंबित असल्याने या भागातील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. भविष्यात वाढणारी प्रवासी व मालवाहतूक लक्षात घेता, उर्वरित मार्गांचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.