

पुणे : 'जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया...' या अभंगाच्या सुरांनी, टाळ-मृदुंगाच्या निनादाने आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजराने शनिवारी दिवेघाट परिसर भक्तिमय झाला. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिवेघाटाची अवघड चढण पार करून सायंकाळी सासवड येथे मुक्कामी पोहोचला, तर संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर येथे विसावली.
पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. हडपसर येथे भाविकांनी पुष्पवृष्टी करत पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले.
संत ज्ञानेश्वर महाराजांचीपालखी वडकी येथे दुपारच्या विसाव्यानंतर दिवेघाटाच्या दिशेने निघाली. घाटात प्रवेश करताच अभंग, टाळ-मृदुंग आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. लाखो वारकऱ्यांनी उत्साहाने घाट चढत सासवड येथे प्रवेश केला, जिथे ग्रामस्थांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले.
दरम्यान, संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर येथे मुक्कामी दाखल झाली. पादुकांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. एकादशीच्या पार्श्वभूमीवर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने भारलेल्या या सोहळ्याने दिवेघाट पुन्हा एकदा विठ्ठलनामात दुमदुमून गेला.