मुंबई: भारतीय शाळा जगात सर्वोत्कृष्ट ठरणे हे जागतिक पातळीवर भारतीय शिक्षण पद्धतीला जगमान्यता मिळण्यासारखे आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेचे जगात सर्वोत्कृष्ट ठरणे हा क्षण देश आणि राज्याच्या शासकीय शिक्षण व्यवस्थेसाठी कलाटणी देणारा क्षण आहे, असे गौरवोद्गार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काढले.
इंग्लंड येथे मुख्यालय असणाऱ्या जागतिक संस्थेने आयोजित केलेल्या 'वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन' स्पर्धेमध्ये जगभरातील समुदायाने पसंती क्रमानुसार केलेल्या मतदानानुसार पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळा सर्वाधिक मते मिळवून 'कम्युनिटी चॉइस ॲवॉर्ड' या मानाच्या विभागात सर्वोत्कृष्ट ठरली.
लोकसहभागातून विकसित जिल्हा परिषदेची ही शाळा आहे. या शाळेला एक कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री दादाजी भुसे यांनी बुधवारी मालेगाव येथे पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.