
जळगावजवळ पाचोरा नजीक पुष्पक एक्सप्रेसचा विचित्र अपघात झाला. या अपघातात किमान आठ जणांच्या मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक जण जखमी आहेत. दरम्यान या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
फडणवीस यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले, ''जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे.''
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीक येथून विचित्र रेल्वे दुर्घटनेची मोठी बातमी समोर येत आहे. परांडा येथून पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी रेल्वेत आग लागल्याच्या भीतीने थेट रूळावर उड्या मारल्या त्याचवेळी तेथून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवले, अशी माहिती घटनास्थळावरून मिळत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 8 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर 30 ते 40 जण जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच मृतांचा आकडा वाढू शकतो. तर पुष्पक एक्सप्रेसमध्ये खरोखर आग लागली होती की आग लागल्याची अफवा पसरली होती, हे अद्याप निश्चितपणे समजलेले नाही.
दरम्यान, अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेवर अमित शाह यांनी देखील एक्स पोस्ट करत दुःख व्यक्त केले आहे.
अमित शाह यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, '' महाराष्ट्रातील जळगाव येथे घडलेला रेल्वे अपघात अत्यंत दुःखद आहे. या संदर्भात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. स्थानिक प्रशासन जखमींना शक्य ती सर्व मदत पोहोचवीत आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या होवोत अशी कामना करतो.''