"फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी," संजय निरुपम यांची मागणी

निवडणूक आयोगाकडून पारदर्शकपणे मतदान प्रक्रिया पार पाडत असताना एका वृत्तपत्राच्या खोट्या बातमीचा आधार घेत निवडणूक आयोगाच्या निकालावर चुकीचे आरोप करणाऱ्यांनी माफी मागायला हवी," अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.
"फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी," संजय निरुपम यांची मागणी
Published on

मुंबई: लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातील मतमोजणीबाबत प्रसिद्ध केलेली बातमी खोटी असल्याची कबुली संबंधित इंग्रजी वृतपत्राने दिली असून त्याबद्दल माफी मागितली असल्याचं शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत संजय निरुपम बोलत होते. सोशल मिडियावर फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

त्या सर्वांनी माफी मागायला हवी...

"मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे रविंद्र वायकर ४८ मतांनी विजय झाला. मात्र विरोधकांनी या निकालावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषदेत उत्तरे दिली. ते म्हणाले की, इंडिया आघातील सर्वच नेत्यांनी वृत्तपत्रातील खोटी बातमी पोस्ट केली. त्या सर्वांनी माफी मागायला हवी. जर वृत्तपत्राने माफी मागितली आहे तर आदित्य ठाकरेंनीही माफी मागायला हवी. निवडणूक आयोगाकडून पारदर्शकपणे मतदान प्रक्रिया पार पाडत असताना एका वृत्तपत्राच्या खोट्या बातमीचा आधार घेत निवडणूक आयोगाच्या निकालावर चुकीचे आरोप करणाऱ्यांनी माफी मागायला हवी," अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.

ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही...

"ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, असा दावा निरुपम यांनी केला. जर ईव्हीएम हॅक होऊ शकते मग काँग्रेसच्या इतक्या जागा निवडून आल्या असत्या का? सुमारे एक लाख मतांची मोजणी शिल्लक असताना उबाठा गटाचे अमोल किर्तीकर विजयी झाले अशी बातमी संध्याकाळी ५.४० वाजता कशी व्हायरल होते?" असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केला.

मतमोजणीवेळी तिथे मोबाईल घेऊन जाणाऱ्या विरोधात वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याबाबत चौकशी आणि कारवाई व्हावी, असे निरुपम यांनी सांगितले. शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न उबाठाकडून केला जात असल्याचं निरुपम म्हणाले. खोट्या बातमीमुळे पोलिस, निवडणूक अधिकारी यांना बदनाम केले गेले. आमच्या पक्षाचीही बदनामी झाली त्याबद्दल न्यायालयात दाद मागण्याबाबत पक्ष प्रमुख ठरवतील, असं ते म्हणाले.

सामना आणि रश्मी ठाकरे यांनी माफी मागावी

सामनात आज पुन्हा एक खोटी बातमी प्रसिद्ध करण्यात आली. सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे आहेत. यांसदर्भात सामनाने जाहीर माफी मागितली नाही, तर प्रेस काऊन्सिलकडे दाद मागू, असा इशारा संजय निरुपम यांनी दिला.मातोश्री २ ही फेक नरेटिव्हची फॅक्ट्री आहे आणि त्याचे कारकून संजय राऊत आहेत, अशी टीका निरुपम यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in