मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेली ‘भारत जोडो न्याय यात्रा’ मंगळवारपासून महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. या यात्रेचा समारोप १७ मार्चला शिवाजी पार्कवरील सभेने होणार आहे.
महाराष्ट्रात ही यात्रा यशस्वी व्हावी म्हणून काँग्रेस नेत्यांनी कंबर कसली आहे. या यात्रेच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. राहुल गांधी यांची यात्रा मंगळवारी नंदुरबार जिल्ह्यात येईल. त्यानंतर १३ मार्चला धुळे, मालेगाव, १४ मार्चला नाशिक, १५ मार्च रोजी पालघर, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा १६ मार्च रोजी मुंबईत दाखल होणार आहे. १७ मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होत असून यावेळी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.