जिल्हा परिषद निवडणुकीत 'कुटुंब रंगलंय राजकारणात'; रायगडमध्ये पती-पत्नी, सासू-सून उतरलेत निवडणूक रिंगणात

राजकारणात घराणेशाही नवी नाही; मात्र यंदाच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातील पती-पत्नी तसेच सासू-सून अशा नात्यांतील उमेदवार एकाचवेळी निवडणूक रिंगणात उतरल्याने रायगडच्या राजकारणात अनोखा योग निर्माण झाला आहे. त्यामुळे 'कुटुंब रंगलंय राजकारणात' अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत 'कुटुंब रंगलंय राजकारणात'; रायगडमध्ये पती-पत्नी, सासू-सून उतरलेत निवडणूक रिंगणात
'एआय'ने बनविलेली प्रतिमा
Published on

अलिबाग : रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांनी यंदा केवळ पक्षीय समीकरणेच नव्हे, तर घराणेशाहीचा मुद्दाही नव्याने ऐरणीवर आणला आहे. राजकारणात घराणेशाही नवी नाही; मात्र यंदाच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातील पती-पत्नी तसेच सासू-सून अशा नात्यांतील उमेदवार एकाचवेळी निवडणूक रिंगणात उतरल्याने रायगडच्या राजकारणात अनोखा योग निर्माण झाला आहे. त्यामुळे 'कुटुंब रंगलंय राजकारणात' अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अमित नाईक हे शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत असून, त्यांची पत्नी अमृता नाईक यांनी वैजाळी पंचायत समिती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून महेश गुरव हे आक्षी पंचायत समिती मतदारसंघातून, तर त्यांची पत्नी पूजा गुरव या चेंढरे जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. भाजपचे वैकुंठ पाटील हे पेण तालुक्यातील दादर जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत असून, त्यांच्या पत्नी शर्मिला वैकुंठ पाटील या बेणसे जिल्हा परिषद मतदारसंघातून मैदानात उतरल्या आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या आरती पाटील यांनी चेंढरे जिल्हा परिषद मतदारसंघातून, तर त्यांचे पती प्रफुल्ल पाटील यांनी आक्षी पंचायत समिती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

घराणेशाहीच्या चर्चेला अधिक धार देणारा मुद्दा म्हणजे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कुटुंबातील उमेदवारी. आमदार दळवी यांच्या पत्नी थळ जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत.

घराणेशाहीचा बोलबाला

एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात कुटुंबीय निवडणूक रिंगणात उतरण्याची रायगड जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ मानली जात आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घराणेशाहीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. काही मतदार याकडे अनुभव व ओळखीचा फायदा म्हणून पाहत असले, तरी अनेक नागरिक लोकशाहीतील समान संधीच्या तत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

२७ जानेवारीनंतरच चित्र स्पष्ट

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २७ जानेवारी असल्याने या सर्व जोड्यांचे अर्ज कायम राहतात की काही माघार घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. २७ जानेवारीनंतरच रायगडच्या राजकारणातील घराणेशाहीचा हा पॅटर्न कितपत प्रभावी ठरणार, हे स्पष्ट होणार आहे.

आंबेपूरमधून चित्रा पाटील

भाजपच्या चित्रा पाटील या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत असून, त्यांचे पती आस्वाद पाटील हे शहापूर पंचायत समिती मतदारसंघातून अपक्ष रिंगणात उतरले आहेत. प्रियदर्शनी पाटील यांनी चेंढरे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली असून, त्यांचे पती संजय पाटील हे आक्षी पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in