
मुंबई : रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. त्यात १५ ऑगस्टला रायगडमध्ये झेंडावंदन कोण करणार, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिंदे सेनेत तू तू मैं मैं सुरू आहे. दरम्यान, रायगडमध्ये झेंडावंदन करण्याचा मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाला देतात याकडे राष्ट्रवादी व शिंदे सेनेसह रायगडवासीयांचे लक्ष लागले आहे.
नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रिपदासाठी भाजप व शिवसेनेने समन्वय साधून तोडगा काढल्याचे समजते. रायगडमध्ये सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या मंत्री आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र मंत्री भरत गोगावले आक्रमक झाल्याने रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे.
वाद अधिक चिघळण्याची शक्यता
१५ ऑगस्ट जवळ आला असून त्या दिवशी झेंडावंदन करण्यासाठी मंत्री भरत गोगावले यांनी तयारी केली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीही झेंडावंदन करण्यासाठी आग्रही असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.