

माथेरान : अपूर्ण अवस्थेत असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुरू करण्यात आलेल्या टोलवसुलीविरोधात आता रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. जोपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होत नाही आणि अधिकृत उद्घाटन होत नाही, तोपर्यंत टोलवसुली तत्काळ बंद करण्यात यावी, अशी जोरदार मागणी रायगड प्रेस क्लबने केली.
अर्धवट रस्ता, खड्डे, सुरू असलेली कामे, वाहतूककोंडी आणि अपघातांच्या वाढत्या धोक्यामुळे नागरिक त्रस्त असताना प्रशासन जनतेच्या खिशावर टोलचा भार टाकत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
‘जनतेला सुविधा नाहीत, मग टोल वसुली कोणत्या आधारावर केली जाते?’ असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला. विशेषतः ‘एमएच-४६’ आणि ‘एमएच-०६’ या स्थानिक नोंदणी क्रमांकाच्या वाहनांना तत्काळ टोलमाफी देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि प्रवास करणाऱ्या वाहनधारकांवर आर्थिक बोजा टाकला जात आहे.