पेण - रायगड जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या जोरदार तर काही ठिकाणी मध्यम सरी कोसळत आहेत, कोलाड, माणगाव, इंदापूर, नागोठणे, रोहा, उरण पेण भागात पावसाचा जोर अधिक आहे. या पावसाने महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. अलिबाग, मुरुड या किनारपट्टीच्या भागात पाऊस किरकोळ स्वरूपाचा आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात दाट ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्यात. साखरचौथ गणेशोत्सवावर पावसाचे सावट आहे.
रायगड जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचे आगमन होत आहे. सोमवारी जिल्ह्यात पावसाने सायंकाळ पासून सुरुवात केली होती. त्यामुळे साखर चौथ गणरायाची आगमन मिरवणूक गणेश भक्तांना पावसात साजरी करावी लागली. सलग दोन दिवस पडत असलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. सकाळपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. काही भागात पावसाच्या तुरळक सरी पडत असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पाऊस असाच पडत राहिला तर साखरचौथ गणेशाची होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीहि पावसात साजरी होण्याची शक्यता आहे. या मिरवणुकीला विद्युत रोशनाई तसेच अनेक वाद्यांची रेलचेल असते.