जिल्हा रुग्णालयात पावसाचे पाणी; रुग्णालय वर्षानुवर्षे समस्यांच्या वेढ्यात, रुग्ण, डॉक्टरांसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

रुग्णालयाबाहेर बेशिस्त वाहन पार्किंग, रस्त्यावर पसरलेले सांडपाणी, अस्वच्छतेचा सुकाळ, वारंवार कोसळणारे स्लॅब, शवविच्छेदन खोलीकडे जाणाऱ्या मार्गात पडलेले असंख्य खड्डे, नादुरुस्त असलेल्या अनेक वैद्यकीय मशिन्स, डॉक्टरांचा अभाव अशा अनेक समस्या येथे आपोआपच निदर्शनास येतात.
जिल्हा रुग्णालयात पावसाचे पाणी; रुग्णालय वर्षानुवर्षे समस्यांच्या वेढ्यात, रुग्ण, डॉक्टरांसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Published on

अलिबाग : अलिबागमधील रायगड जिल्हा रुग्णालय जिल्ह्यातील गरीब, गरजू आणि आदिवासी बांधवांचे आशास्थान आहे. आपल्या रुग्णावर येथे योग्यरीत्या उपचार होतील आणि रुग्णांचे प्राण बचावतील या आशेने येथे दिवसाला एक हजारपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र वर्षानुवर्षे या रुग्णालयाची वास्तू समस्यांच्या विळख्यात अडकत चालली आहे.

रुग्णालयाबाहेर बेशिस्त वाहन पार्किंग, रस्त्यावर पसरलेले सांडपाणी, अस्वच्छतेचा सुकाळ, वारंवार कोसळणारे स्लॅब, शवविच्छेदन खोलीकडे जाणाऱ्या मार्गात पडलेले असंख्य खड्डे, नादुरुस्त असलेल्या अनेक वैद्यकीय मशिन्स, डॉक्टरांचा अभाव अशा अनेक समस्या येथे आपोआपच निदर्शनास येतात.

मात्र आता एक नवीनच समस्या येथे रुग्णांची आणि डॉक्टरांची डोकेदुखी ठरत आहे. जिल्हा रुग्णालयात पावसाच्या पाण्याने शिरकाव केला असून पावसाचे पाणी रुग्णांच्या खोलीत शिरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तब्बल वीतभर पाणी रुग्णालयात शिरल्यामुळे रुग्णाच्या बेडखाली पाणीच पाणी साचल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयात पाणी शिरल्याने नर्स आणि ब्रदर्स हे पाणी काढण्याच्या कामात गुंतलेले आहेत. मात्र पावसाचा जोर सतत वाढत असल्यामुळे पाणी साचण्याचे प्रमाण देखील वाढत आहे त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक व कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

प्रशासनामुळेच परिस्थिती 'जैसे थे'

जिल्हा सामान्य रुग्णालय सुमारे ३० वर्षांपूर्वीचे आहे. या ठिकाणी २५० बेड‌्स आहेत. दररोज हजारपेक्षा अधिक रुग्ण येथे उपचारासाठी येतात. मात्र ही वास्तू समस्यांच्या गर्तेतून बाहेर येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. रुग्णालयाच्या या परिस्थितीला येथील प्रशासन कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. केवळ वरवरची मलमपट्टी करून दरवर्षी ही वस्तू दुरुस्त केली जाते आणि दर पावसाळ्यात ही मलमपट्टी गळून पडत असून केवळ 'जैसे थे' परिस्थितीच पाहायला मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in