
मुंबई : विधानसभा निवडणुकीत ९६ लाख बोगस मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत. मुंबईत ८ ते १० लाख, ठाण्यात ८ लाख तसेच प्रत्येक जिल्ह्यात बोगस मतदार भरण्यात आले आहेत. १ जुलै रोजी त्यांनी यादी बंद करून टाकली आणि त्यात हा गोंधळ झाला आहे. अशाप्रकारे निवडणुका होत असतील, तर हा राज्यातील जनतेचा आणि मतदारांचा अपमान आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबईतील गोरेगावच्या नेस्को ग्राउंडवर आयोजित केलेल्या भव्य मेळाव्यात सत्ताधारी पक्षांवर आणि निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राज ठाकरे म्हणाले की, "मॅचफिक्सिंग झालेले आहे, तुम्ही मतदान द्या किंवा नको. मग सांगतात की, यांचा एक आमदार निवडून आला नाही, एक खासदार निवडून आला नाही. अरे कसा येणार, तुम्ही अगोदरच फिक्स करून ठेवले आहे."
"आम्ही निवडणूक आयोगाला याबाबत जाब विचारत आहोत, तर सत्ताधाऱ्यांना राग येतोय, कारण त्यांनी शेण खाल्ले आहे. निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षांचा गुलाम नाही. मतदान यादी स्वच्छ होत नाही, तोपर्यंत निवडणूका होऊच नये. आता तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीच बेधडकपणे बोगस मतदार घुसवल्याचे मान्य केले आहे. सत्ताधारी आमदार विलास भुमरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले होते की, त्यांनी बाहेरून २० हजार मतदार आणले. बेधडक सत्ताधारी पक्षातील आमदार तुमच्या नाकावर टिच्चून बोलत आहात," असेही राज ठाकरे म्हणाले.