मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या कोंकण दौऱ्यावर आहेत. आज (गुरुवारी) त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर होणाऱ्या राजकरणावरून टीका केली. "जातीय राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरले जात आहे. एवढंच नव्हे तर मराठा समाज आणि इतर समाजांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेच याची सुरुवात केली आहे," असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे म्हणाले की, "जातीय राजकारणाची सुरुवात ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासूनच झाली. शरद पवार यांनी कधीही शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही. त्यांना मुस्लिम मते जाण्याची भीती वाटतेय. म्हणूनच इतर टोळ्या उभ्या करून हे राजकारण करत आहेत. त्यातून फंडिग गोळा करण्यात आले आहे. १९९९पासून हे विष राज्यात कालवलं गेले आहे." पुढे त्यांनी, 'जातीच्या राजकारणासाठीच शिवाजी महाराजांचा अवमान केला जात आहे. याआधी जी लोकं होती त्यांना काय इतिहास माहीत नव्हता का? तो आत्ताच का जागृत झाला?' असा परखड सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सांगताना म्हणाले की, "शरद पवार याआधी कधीही शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे नाहीत. त्यांची सर्व भाषणे काढून बघा. व्यासपीठावर फक्त शाहू, फुले, आंबेडकर असतात. मी एका मुलाखतीत त्यांना याबाबत विचारले देखील होते. त्यावर त्यांनी 'शाहू, फुले, आंबेडकर हा विचार आहे,' असे उत्तर दिले होते. मग शिवाजी महाराज हा विचार नाही का? त्यांच्या विचारावरच पुढचे विचार आले ना?"