मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून रत्नागिरीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा राज्यपालांनी केलेल्या विधानावर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, "राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना असं बोलण्यासाठी कोणी सांगत की काय? असं मला कधीकधी प्रश्न पडतो. नवीन वाद उकरून काढून लक्ष वळविण्यासाठी व्यूहरचना सुरू आहे का? असं मला कधी कधी वाटत. कोणीही उठावं आणि इतिहासावर बोलावं. असं करू नये. राज्यपालांना पत आहे. पण पोच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने फक्त वादच घालत बसायचं आहे. आपलं अपयश झाकण्यासाठी यासर्व गोष्टी काढल्या जातात," अशी टीका त्यांनी केली.
पुढे ते म्हणाले की, "इतिहासावर बोलताना आधी ज्यांकडे अधिकार आहेत, त्यांच्याकडून कागदपत्र तपसा. इतिहास हा चित्रपटामध्ये रंजित करूनच मांडावा लागतो. पण ते करताना इतिहासाला डाग न लागता चित्रपट बनवले पाहिजेत. त्यामुळे जे लेखक किंवा चित्रपट निर्माते आहेत, त्यांनी नीट संशोधन करा. तानाजी सिनेमात जे दाखवलं ते सर्वच तसं घडलं होतं का? नाही. मग ते दाखवलं नसतं तर तुम्ही सिनेमा पाहिला असता का?" असा सवालही त्यांनी केला.