मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबतच राहणार का? याविषयी सध्या तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र हे अंदाज फोल ठरवत, मनसेने स्वबळाचा नारा दिला आहे. वांद्रे येथील मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी ही घोषणा केली. तसेच या विधानसभा निवडणुकीत २२५-२५० जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे राज ठाकरे यांनी गुरुवारी जाहीर केले. जवळपास १ ऑगस्टपासून स्वत: राज ठाकरे महाराष्टाचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे म्हणाले की, “यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मला मनसेचे नेते काहीही करून सत्तेत बसवायचे आहेत. माझ्या या वक्तव्यावर अनेकांना हसू येईल. परंतु हे खरे ठरणार आहे. त्याकरिता मनसे पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. युतीचा विचार मनात आणू नका. मनसे २२५ ते २५० जागांवर लढणार आहे. पक्षांतर्गत टीम जिल्ह्यांचे दौरे करणार आहेत. तुमच्याशी बोलतील. माझ्याकडे जो काही सर्व्हे येईल. त्यानंतर जवळपास १ ऑगस्टपासून मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. पावसामुळे मेळावे घ्यावे की नाही हे ठरवू. पदाधिकाऱ्यांशी, महाराष्ट्र सैनिकांशी संवाद होईलच. निवडून येण्याची क्षमता असणारे आणि ज्यांची तयारी आहे अशांनाच निवडणुकीचे तिकीट दिले जाणार आहे.”