मुंबई : मराठा आरक्षण विधेयकाला विधिमंडळात एकमताने मंजुरी दिली गेली असून १० टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. विधीमंडळात विधेयक मंजूर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा मला आनंदच आहे. या समाजाने जागृत राहावं. पण राज्य सरकार तोंडाला पानं पुसण्याचं काम करत आहे. राज्य सरकारला या गोष्टींचे अधिकार नाहीत. हा केंद्राचा अधिकार आहे, अस म्हणत ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केलीय.
ठाकरे पुढे म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये काही तांत्रिक गोष्टी आहेत. राज्यात अनेक जाती आहेत. त्यांचेही विषय आहेत. मला कळत नाही की, हे सर्व काय सुरु आहे. राज्यात इतरही भीषण विषय आहेत. दुष्काळ आणि पाण्याचा प्रश्न आहे. पण राज्य सरकार मूळ विषयावर दुर्लक्ष करतं. आरक्षण देण्याचा अधिकार मुळात सरकारला आहे का, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
आरक्षणाचा विषय हा राज्याचा नाहीच. तो केंद्र सरकारचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवरचा विषय आहे. यात तांत्रिक अडचणी आहेत. हा फक्त झुलवण्याचा प्रकार आहे. हाताला काही लागणार नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी विधानसभेचे एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. “मराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या हातात नाहीच. तो केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवरच सोडविला जाऊ शकतो. हे मी मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे गेलो होतो, तेव्हाच स्पष्ट केले होते,” असे राज ठाकरे म्हणाले.