मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरे सरसावले ; दिली आंदोलनाची हाक

हा महामार्ग पुर्ण होऊन कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आज पनवेलमध्ये निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं
मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरे सरसावले ; दिली आंदोलनाची हाक

मागील १२-१३ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेने आता आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. हा महामार्ग पुर्ण होऊन कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आज पनवेलमध्ये निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना आंदोलन कसं असलं पाहीजे, यावर मार्गदर्शन केलं. पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, रस्ते आस्थापनाच्या अध्यक्षांसह अनेक लोक आहेत, पण पक्ष म्हणून तुम्हाला यात उतरावं लागेल. पनवेलपासून ते सावंतवाडीपर्यंत सर्वांना उतरावं लागेल. ज्या ठिकाणी गरज असेल तिथे एकमेकांना सहकार्य करावं लागेल. आपल्याला लोकांना त्रास द्यायचा नाहीये, हे लक्षात ठेवा. पण आंदोलन अशा प्रकारचं झालं पाहीजे की सरकारकडून तात्काळ पाऊलं उचलली गेली पाहीजे आणि लोकांना चांगला रस्ता मिळाल पाहीजे, असं राज ठाकरे म्हणाले.

घाण करुन टाकतील

राज ठाकरे कोकणविषयी बोलताना म्हणाले की, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना माझं सांगणं आहे संपूर्ण कोकणवर तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. कोण जमिनी पळवतोय. आज जे बाकीच्या ठिकाणी सुरु झालंय की, लोक हिंदी बोलायला लागले आहेत. सर्व कोकणचं रुपडं घाण करुन टाकतील, असं राज म्हणाले. तसंच कोकणात उद्योग आले पाहिजेत, पण कोकणाचं सौंदर्य राखून आले पाहीजे. सहसा असा प्रदेश मिळत नाही. परमेश्वराची कृपा ती मिळाली, ती जपावी. अशी साद देखील त्यांनी यावेळी घातली.

गरज असेल तिथे हक्काने बोलवा

आंदोलनाविषयी बोलताना ते म्हणाले की, रस्ते करताना अशी भीती असावी, दहशत असावी, असं आंदोलन करा. मी तुमच्यासोबत आहेच. माझी तिथे जिथे गरज लागेल तिथे तुम्ही मला हक्काने बोलवा. असं देखील राज ठाकरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in