
कराड : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडीसह म्हसवड परिसरात सलग ५ ते ६ दिवसांपासून वरुण राजा जोरदार बरसला. गत ५ दिवसांपासून माण तालुक्यात संततधार सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. माण तालुक्याच्या पश्चिमेस पावसाचा जोर वाढल्याने व माण गंगा परिसरात सततच्या पावसाने माणगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पावसामुळे ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.
यंदा उन्हाळी आवर्तनाचे जिहे-कठापूर योजनेचे पाणी माणगंगा नदीत सोडले होते. त्यातच मान्सूनपूर्व पाऊस तलाव सिंचन क्षेत्रात जोरदार बरसला. त्यामुळे मे महिन्याच्या सुरुवातीला या तलावात १० फूट पाणी पातळी होती. हा तलाव पूर्ण क्षमतेने वाहण्यासाठी २५ फूट पाणीसाठा होणे गरजेचे असते. माणगंगा दुथडी भरून वाहिल्याने हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.