जळगाव : सोन्यासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या राजमल लखीचंद (आर. एल.) या फर्मच्या जळगावच्या मुख्य कार्यालयावर गुरुवारी पहाटे ईडी (सक्तवसुली संचालनालय) पथकाने तपासणी केल्याचे वृत्त आहे. ‘ईडी’च्या २० ते २५ अधिकाऱ्यांच्या पथकाने १५ ते १८ तास ही तपासणी केली. संचालक माजी आमदार मनीष जैन यांनी या तपासणीबाबत मौन बाळगले आहे. ईडीच्या नागपूर कार्यालयाकडून ही तपासणी केल्याचे समजते.
गुरुवारी पहाटे चार वाजता ईडीचे अधिकारी दाखल झाले. पाठोपाठ औरंगाबाद, नाशिक येथून आलेले पथक सहभागी झाले. सकाळी तपासणीस सुरुवात झाली. आत कुणालाही प्रवेश नव्हता. दिवसभर ग्राहकांसाठी फर्म बंद होती. मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात होते. राजमल लखीचंदची विविध आस्थापनांची चौकशी झाल्याचे समजते, मात्र अधिकृतरीत्या या तपासणीबाबत सांगण्यात आले नाही. जळगावातल्या अन्य सुवर्णपेढ्यांनी मात्र या तपासणीचा धसका घेतला.