
मुंबई : उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी नेमलेल्या सरकारी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला.
जानेवारी २०२५ पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे राम नाईक यांना तीनदा दीर्घकाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता प्रकृती स्थिर असली तरी अजूनही संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने राम नाईक यांनी हा राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. राम नाईक यांचा मत्स्य व्यवसाय संदर्भातील प्रदीर्घ अनुभव तसेच समितीपुढे आलेल्या सूचनांमुळे मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देणे ही काळाची गरज असल्याचे मत नाईक यांनी व्यक्त केले होते. योगायोगाने, समितीचा अहवाल सादर करण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्या महिन्यात मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला.