"विधानसभा निवडणुकीत आम्हाला ८ ते १० जागा हव्यात...रामदास आठवलेंची महायुतीकडे मागणी

लोकसभा निवडणुकीत आम्हाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आठ ते दहा जागा हव्या आहेत, असं रामदास आठवले म्हणाले.
"विधानसभा निवडणुकीत आम्हाला ८ ते १० जागा हव्यात...रामदास आठवलेंची महायुतीकडे मागणी
Published on

देशभरामध्ये नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. लोकसभा निवडणूकीनंतर आता महाराष्ट्रात काहीच महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील विविध पक्ष जागावाटपावरून रोज नवनवे दावे करत असतानाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आठवले गटानं महायुतीकडे आठ ते दहा जागांची मागणी केली आहे.

विधानसभा निवडणुकीत आठ ते दहा जागा हव्या: रामदास आठवले

आरपीयआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, “काही दिवसांपूर्वी आमची उपमुख्यमंत्री आणि भाजपचे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी जागावाटपावर चर्चा झाली होती. त्यावेळी आम्ही त्यांना म्हणालो होतो की, लोकसभा निवडणुकीत आम्हाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आठ ते दहा जागा हव्या आहेत. महायुतीत भाजपाबरोबर अनेक मित्र पक्ष आहेत. परंतु, आमची आठ ते दहा जागांची मागणी आहे.”

जागा लढायच्या आणि त्या निवडून आणायच्या...

आठवले पुढे म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत आम्हाला उमेदवारी मिळाली नाही. पण आम्ही ठरवलंय की, विधानसभेच्या काही जागा लढायच्या आणि त्या निवडून आणायच्या. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आलं असलं, तरी त्याची काही कारणं होती. महाविकास आघाडीनं जनतेला ब्लॅकमेल केलं, संविधानाबाबत अफवा पसरवून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्याचा आम्हाला फटका बसला. परंतु विधानसभा निवडणुकीत आम्ही या गोष्टीची काळजी घेऊ. दलित आणि मुस्लिमांमधील नाराजी दूर करू, त्यांच्यातील गैरसमज दूर करून त्यांना आमच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करू.”

logo
marathi.freepressjournal.in