शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, 'नारायण राणेंनी सुशांत सिंह राजपूत, आदित्य ठाकरे यांची बदनामी केली. आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यात राणे पिता-पुत्रांचा मोठा वाटा आहे. राणे पिता-पुत्रांनी भाजपचा व्यासपीठ वापरून आदित्य ठाकरे यांची बदनामी केली. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नारायण राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांची बदनामी केली. याबाबत मी पंतप्रधानांशी वैयक्तिक संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यावर पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली. बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाप्रती पंतप्रधानांना प्रेम आणि आदर असल्याचे दिसून आले. हे प्रकरण पंतप्रधानांपर्यंत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा सुरू झाली. यानंतर पंतप्रधान मोदी आणि उद्धव यांची भेट झाली.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी हे गुपित उघड केले आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे संबंध कायम ठेवण्यास तयार होते, मात्र नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद दिल्यानंतर ठाकरे नाराज झाले आणि संबंध बिघडले, असा खुलासा दीपक केसरकर यांनी केला आहे.
भाजप आणि शिवसेना यांच्यात चर्चा सुरू असतानाच भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे संबंध बिघडले. यानंतर नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे नाराज झाले. त्यामुळे अनेक शिवसेना कार्यकर्तेही नाराज झाले होते. राणेंनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करून त्यांची बदनामी केली. भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी उद्धव ठाकरे तयार होते. मात्र नंतर वेळेअभावी ते झाले नाही आणि संबंध बिघडले, असे केसरकर म्हणाले.