
मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला एक हाती सत्ता स्थापन करण्याचा बहुमान दिला. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही विधानसभा निवडणुकीत बाजी मारली. त्यामुळे बावनकुळे यांच्या जागी भाजप प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहऱ्याला संधी दिली जाणार आहे. तूर्तास प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाण यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. परंतु आगामी मुंबई महापालिका निवडणुका, विरोधकांना सडेतोड उत्तर देणारा प्रदेशाध्यक्षाची भाजपला गरज असून रवींद्र चव्हाण यांच्या हाती प्रदेशाध्यक्षपदाची धुरा देण्याबाबत भाजपमध्ये हालचाली सुरू आहेत. मार्चपर्यंत चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल, असे भाजपकडून सांगण्यात आले.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३५ जागांवर विजय मिळाला. त्यापैकी १३२ जागांवर भाजपने बाजी मारली. विधानसभा निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष भाजपला घवघवीत यश मिळाले. त्या यशात देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आदी नेत्यांचे मोठे योगदान आहे. त्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल मंत्री म्हणून जबाबदारी स्विकारली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी भाजपला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यात रवींद्र चव्हाण तीन वेळा विजयी झाले आहेत.