

नाशिक : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नातवासह आठ जणांविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात दहा कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार भाजप पदाधिकारी कैलास आहिरे यांनी दाखल केली असून, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, उद्योजक कैलास आहिरे यांच्या मालकीच्या कंपनीत दानवेंच्या नातू शिवम पाटील यांना भागीदारी देण्यात आली होती. या भागीदारीच्या बदल्यात एकूण २५ कोटी रुपयांचा व्यवहार ठरला होता. मात्र, त्यापैकी केवळ १५ कोटी रुपयेच अदा करण्यात आले, तर उर्वरित १० कोटींची रक्कम देण्यात आली नाही, असा आरोप आहिरे यांनी केला आहे.
फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, रावसाहेब दानवेंनी स्वतः त्यांच्याशी संपर्क साधत, “माझ्या नातवाला पार्टनर करा, मी सरकारी कामं मिळवून देईन, कंपनीची उलाढाल वाढवून देईन,” असे सांगितले होते. त्यांच्या प्रभावामुळे त्यांनी प्रस्ताव मान्य केला, मात्र नंतर आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली.