सणासुदीच्या काळात गावी अथवा पर्यटनस्थळी जाण्यासाठी नागरिकांची लगबग सुरु असते. अशातच यंदा दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक होती. ही बाब ओळखत खासगी बसचालक-मालकांनी तिकिट दरात कमालीची वाढ केली. त्यामुळे गावी जाण्यासाठी प्रवाशांना तिकिटासाठी जादा पैसे मोजावे लागले. परंतु सद्यस्थितीत सणासुदीची धामधुम संपल्याने दिवाळीनंतर खासगी बस चालक-मालकांकडून तिकिटांचे दर कमी करण्यात आले आहेत.
अधिक महसूल मिळावा यासाठी सणासुदीच्या काळात खासगी बसच्या तिकीट दरात वाढ करण्यात येते. यंदा एसटी महामंडळाने देखील २१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या दिवाळीच्या कालावधीत १० टक्के भाडेवाढ केली. त्यापाठोपाठ खासगी बसेसच्या तिकीट दरातही सर्वाधिक वाढ करण्यात आली. परंतु यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड पडला. दिवाळी सुट्टी पाहता अनेकांनी आपल्या गावी आणि पर्यटनासाठी जाण्याचे नियोजन आधीच केले होते. परिणामी खासगी बस चालक-मालकांना एसटी महामंडळापेक्षा चांगला महसूल प्राप्त झाला. मात्र प्रवाशांचे अतोनात हाल झाले. अखेर सण आणि सुट्ट्या संपताच १ नोव्हेंबरपासून खासगी बसच्या तिकीट दरात घट करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून एसटी महामंडळापेक्षा खासगी प्रवासाला प्रवाशांकडून अधिक पसंती दिली जात आहे. अशातच आता दर कमी झाल्याने प्रवासीसंख्येत वाढ झाली आहे.
एसी स्लीपर बसेसच्या तिकीट दरातील बदल :
प्रवास ठिकाण दिवाळी कालावधीत आता
मुंबई-कोल्हापूर २ हजार रुपये ८०० रुपये
मुंबई-औरंगाबाद २ हजार रुपये ६५० ते ७०० रुपये
मुंबई -सिंधुदुर्ग २३०० ते ३ हजार रुपये ११०० ते १२०० रुपये