पूरग्रस्त भागात मदत व बचावकार्य वेगात, गरज भासल्यास आर्मीची मदत घेणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून परिस्थितीचा आढावा

पूरग्रस्त भागात बचाव कार्य वेगाने सुरु आहे. काळजीचं कारण नाही, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडू नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे संग्रहित फोटो
Published on

गेल्या काही तासांपासून मुंबई, पुणे, ठाणे रायगड परिसरामध्ये अतिवृष्टी सुरू आहे. खासकरून पुण्यामध्ये परिस्थिती अधिक भीषण बनली असून मुठा नदीला पूर आल्यामुळं तिच्या काठावरील शेकडो घरांमध्ये पाणी घुसलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या परिस्थितीकडे जातीने लक्ष ठेवून असून त्यांनी प्रशासनाला मदत व बचाव कार्य वेगानं राबवण्याच्या सूचना केल्या आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा, मनपा प्रशासन सज्ज असून संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

गरज भासल्यास आर्मीची मदत घेणार...

पूरग्रस्त भागात बचाव कार्य वेगाने सुरु आहे. काळजीचं कारण नाही, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडू नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. गरज भासल्यास आर्मीची मदत घेणार असल्याचंही ते म्हणाले. राज्यातील खासकरून पुण्यातील पुरपरिस्थिती पाहता एनडीआरएफ, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकात समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

प्रशासन पूर्णपणे सतर्क...

मुख्यमंत्री म्हणाले की, "एक टीमवर्क म्हणून काम करून पूर परिस्थितीतील लोकांना सुरक्षित हलवणे, त्यांना अन्नाची पाकिटे देणे, औषधे, पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. वेळप्रसंगी एनडीआरएफ, लष्कर, नौदल यांची मदत घेण्याच्या सूचना केल्या आहेत. पुणे, मावळ, मुळशी येथे धरण क्षेत्रात पाऊस जास्त पडला आहे, त्यामुळे पुण्याला फटका बसला आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे. मुंबईत कोणत्याही आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क असून मी पुणे, रायगड, मुंबई जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांच्या संपर्कात आहे."

वेळ पडल्यास बाधितांना एअरलिफ्ट केलं जाणार:

"पुण्याच्या बाबतीत संबंधित लष्कर व नौदल अधिकाऱ्यांशी मी बोललो आहे. एखाद्या ठिकाणी लोक अडकले असतील तिथे प्रसंगी हेलीकॉप्टरने कसे त्यांना वाचवता येईल ते पाहण्यास सांगितले आहे. मुंबईत कुर्ला, घाटकोपर येथे साठलेले पाणी काढण्याचे काम सुरु आहे. मुंबईत २५५ पंप सुरु आहेत. मी मुंबई मनपा आयुक्तांना संपूर्ण यंत्रणा या कामी लावण्याचे निर्देश दिले आहेत," असं मुख्यमंत्री म्हणाले.

शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर:

"मुंबईत पाऊस वाढल्याने मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या यंत्रणांना सज्ज ठेवलं आहे. पाऊस आणि पूर परिस्थिती असलेल्या भागात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे, माझं आपणास आवाहन आहे की नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मंत्रालय तसेच जिल्हा पातळीवरून प्रशासन परिस्थितीवर संपूर्ण नजर ठेवून आहे आणि फिल्डवर उतरून काम करीत आहे," असेही मुख्यमंत्री म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in