
कराड : साताऱ्यातील बिदाल, ता. माणचा रहिवासी आणि ग्रामीण रिलस्टार विराज उर्फ गणेश युवराज जगदाळे (१६) याचा मृत्यू झाला आहे. मोटारसायकलचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात त्याचा बळी गेला. विराज त्याच्या मित्रांसोबत दहिवडीला जात असताना हा अपघात झाला. तो सोशल मीडियावर 'तर नमस्कार मित्रांनो, आज काय विषय म्हणशीला' या वाक्याने प्रसिद्ध होता. विराज गुरुवारी दुपारी मित्रांसोबत मोटारसायकलवरून दहिवडीला निघाला होता. बिदाल ते दहिवडी रस्त्यावर,बिदालच्या हद्दीत सावता माळी वस्तीजवळ सर्व मित्र पोहोचले होते. त्याचवेळी अचानक विराजच्या मोटारसायकलचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि विराज रस्त्यावर पडला. या अपघातात विराजच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला.त्याला तातडीने दहिवडी येथे उपचारासाठी नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
सध्या विराज इयत्ता दहावीत शिकत होता. त्याने लहान वयातच अनेक कलांमध्ये प्रावीण्य मिळवले होते. तो कुस्तीमध्ये चांगला मल्ल म्हणूनही प्रसिद्ध होता. इन्स्टाग्रामवर रिल्स बनवून तो रिलस्टार म्हणूनही प्रसिद्ध झाला होता. "तर नमस्कार मित्रांनो आज काय विषय म्हणशीला" या त्याच्या प्रसिद्ध वाक्याने तो घराघरात पोहोचला होता.